अंगत पंगत या ग्रुपवर एकांनी गुलाबजाम आणि जिलबीचे लग्न लावले होते .
ते वाचले आणि अशीच काही कल्पना करून मला लिहावेसे वाटले. ते मी इथे शेअर
करत आहे.
मोदक आणि निवगरी यांची कन्या खोबऱ्याची वडी हिचा विवाह
निश्चित झाला. माहीम हलवा आणि सुतरफेणी यांचा मुलगा मलई पेढा या तिघानांही
मुलगी पसंद पडली. आम्हाला खूप साध्या पद्धतीने लग्न करायचे आहे आणि हो अगदी
फक्त सख्य्या नातेवाईकांनाच बोलवायचे असा दोघांचाही आग्रह होता. फक्त आमची
भांवडेच आम्हाला हवीत. बाकी कोणीही नको. नाहीतर तुमचे रुसवे फुगवेच जास्त
होतात. त्यांना तुम्ही वेगळे रिसेप्शन द्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा
पिढीजात श्रीमंत असल्याने दोघेही नोकरी करत नव्हते.खोबरी वडीचा नारळाच्या
झाडांचा पिढीजात बिझिनेस होता तर पेढ्याचा मेवामिठाईचा पिढीजात बिझिनेस
होता.
लग्नामध्ये जास्त बडेजाव नको. पक्वान्ने नकोत असे त्यांचे म्हणणे दोघांच्या आईवडिलांनी मान्य केले.
छोटेखानी मंडप मोदकाच्या घराच्या अंगणातच सजवला गेला. खोबऱ्याच्या वडीला
बहीणी खूप होत्या. मामे, मावस, चुलत बहीणी. पेढ्याला मात्र फक्त ३ सख्य्या
बहीणी होत्या. खोबऱ्याची वडी आणि पेढा यांनी एकत्र येऊन काय हवे आणि काय
नको हे ठरवले आणि त्यांचे " शुभमंगल" झाले.
लग्नाच्या आधी एक दिवस
मोदकाच्या घरासमोरचे अंगण तांदुळाच्या पिठीने सारवले गेले. त्या अंगणात
साधेच परंतु खूप शोभिवंत सुरळीच्या वडीचे जाजम टाकण्यात आले. जाजमावर
कोथिंबिरीची पाने होती. किसलेल्या ओल्या नारळाची छोटी पांढरी शुभ्र फुले
होती. आणि छोट्या हिरव्यागार मिरच्यांची किनार होती. एकेक मंडळी लग्नाकरता
सजली. खोबरी वडीची एक मानलेली बहिण काजूकतली तिच्या साडीवरच्या चांदीच्या
वर्खाने खूप उठून दिसत होती. चुलत बहिणी अनुक्रमे गाजरवडी, भोपळ्याची वडी
आणि टोमॅटो वडी यांनी ठरवून शेंदरी रंगाच्या पण थोडी शेड वेगळी असलेल्या
साड्या परिधान केल्या होत्या. खोबरी वडीच्या मावसबहीणी अनुक्रमे कोथिंबीर
वडी आणि अळू वडी यांनीही ठरवून एक रंग ठरवला आणि तो म्हणजे हिरवा.
वेगवेगळ्या शेडच्या साड्या आणि त्यामध्ये विटकरी फिरता रंग होता. त्यामुळे
या दोघी बहिणी सगळ्यांच्यात खास उठून दिसत होत्या.
पेढ्याच्या
बहिणींनी मात्र भरजरी शालू नेसले होते. वराच्या बहीणी शोभायला नकोत का?
पिस्ता बर्फीने तिच्या खास ठेवणीतला पिस्ता रंगाचा शालू नेसला की ज्याचा
रंग सगळ्यांमध्ये शोभून दिसेल. आंबा बर्फी सगळ्यात धाकटी. तिने आंब्याच्या
रंगाची खूप भारीतली साडी नेसायचे ठरवले होते. तिला शालूचा भपका तितका पसंत
नव्हता. सगळ्यात मोठ्या मलई बर्फीने खास आपल्या भावाच्या लग्नानिमित्त
क्रीम रंगाचा शालू खरेदी केला होता. त्यावर पिस्ता, बदाम, काजू यांचे अंगभर
बुट्टे होते.
खोबरी वडीला अजिबात सजायचे नव्हते. पण सगळ्यांचा
आग्रह पडला की निदान यादिवशी तरी तिने थोडेसे नटावे. म्हणून मग तिने
थोडासा पिवळसर रंग आणि त्यावर किसलेले बदाम काजू पिस्ते व चारोळ्यांची
नक्षी असलेली साडी तिच्या पसंतीने घेतली. या साडीला केशराची किनारपट्टी
होती. पेढ्यानेही त्याचा पिवळ्या रंगाचा खानदानी झब्बा घातला आणि बोटात
पिस्ते, काजू आणि बदामाच्या अंगठ्या घातल्या.
खोबरी वडीच्या
मामेबहिणी अनुक्रमे खसखस वडी, आले वडी यांनी पण आपला वेगळेपणा दाखवण्यासाठी
फिकट चॉकलेटी रंगाचे पंजाबी सुट घातले होते. असे केल्याने मंडपात बहिणी
बहिंणीमध्ये थोडी कुजबुज सुरू झाली. आपण सगळ्यांच्यात उठून दिसावे म्हणून
नेहमीच या दोघीजणी काही ना काही करत असतात. पण आज लग्नाच्या दिवशी तरी
त्यांनी असे करायला नको होते. ही कुजबूज आले वडीच्या कानावर आली आणि ती
फणकारली आणि म्हणाली घरातच तर साध्या पद्धतीने लग्न आहे मग कशाला एवढा
दिमाख दाखवायचा. मोदकाने आणि निवगरीने मात्र त्या दोघींना सांभाळून घेतले.
खोबरी वडी व पेढा यांनि गुरूजींना बोलवायचे नाही. घरीच तुम्ही सर्वांनी
मिळून मंगलाष्टके म्हणा आणि आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार घालू असे
सांगितले होते. त्यामुळे एक माहेरचे आणि एक सासरचे मंगलाष्टक् म्हणले.
बारीक शेवयांनी विणलेला आंतर्पाट होता तो आंबा बर्फी आणि काजूकतली या
दोघींनी मिळून धरला होता. मंगलाष्टक झाल्यावर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात
रंगीबेरंगी हलव्याच्या माळा घातल्या. पेढ्याने खोबरी वडीच्या गळ्यात
मनुकांचे मंगळसूत्र घातले आणि टुटीफ्रुटीच्या लाल रंगाचे कुंकू लावले.
बडीशेपेच्या रंगीबेरंगी छोट्या गोळ्यांच्या अक्षता होत्या.
त्या
दोघांना बाकीचे सोपस्कार म्हणजे लाजा होम, सप्तपदी असे काहीही नको होते
लग्नानंतर जेवणाची तयारी झाली. पाटवड्यांचे पाट मांडण्यात आले. त्यापुढे
ढोकळ्याचे चौरंग मांडले. त्यावर बत्ताशाचे ताट मांडले गेले. सगळे जण पाटावर
बसले आणि त्या दोघांच्या आईवडिलांनी सगळ्यांना आग्रह करून वाढले.
जेवणामध्ये फळफळावळ, उसळी, आंबट गोड भाज्या, सलाड, फुलके, भाकऱ्या आणि
स्वीट डीश म्हणून साखरभात आणि नारळीभाताच्या मुदी. हा जेवणाचा बेत
नवरानवरीनेच ठरवला होता.
लग्न साध्या पद्धतीने तरी पण थाटामाटात पार
पडले. रितीरिवाजाप्रमाणे खरे तर खोबरीवडीने पेढ्याच्या घरी जायला पाहिजे
पण पेढा जायला निघाला खोबरीवडीच्या घरी. हे गुपीत मात्र दोघांनीही लपवून
ठेवले होते. लग्न झाले की सांगायचे असे ठरवले होते. पेढा खोबरी वडीच्या
घरी जायला निघतोय हे माहिम हलवा आणि सुतरफेणीला अजिबात पसंत नव्ह्ते. पण
पेढा म्हणाला आईबाबा मी काही कायमचा चाललेलो नाहिये. काही महिने मी
त्यांच्याकडे राहणार आणि काही महिने ती आपल्याकडे येऊन राहणार आहे. असे
आमच्या दोघांच्या मतांनी आम्ही लग्ना आधी फिरायला जायचो तेव्हाच ठरवले
आहे. निदान काही महिने तरी खोबरी वडी आपल्याकडे राहील या सांगण्यावर ते
तयार झाले खरे पण त्यांना ते तितके पटलेले दिसत नव्हते. खोबरी वडी म्हणाली
की तुम्ही काही काळजी करू नका मी नक्किच तुमच्याकडे रहायला येणार आहे.
आम्ही दोघांनी ठरवले आहे की वर्षातले काही महिने मी तिकडे व तो इकडे राहील
आणि असाच आमचा संसार सुरू राहील म्हणजे आमच्या घरात पेढाही रूळेल आणि मी तर
तुमचीच आहे की !
आपली मुलगी साधी आणि आधुनिक विचारांची आहेच पण
आपल्याला जावई पण साधाआणि आधुनिक विचारांचा मिळाला आहे हे पाहून मोदक आणि
निवगरी खूप सुखावले गेले.
Saturday, February 25, 2017
Subscribe to:
Posts (Atom)